वनचरा रानसटवाई लेणी, कराडवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर

Описание к видео वनचरा रानसटवाई लेणी, कराडवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर

वनचरा रानसटवाई लेणी, कराडवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर.

अहमदनगर जिल्ह्याला नाथ संप्रदायाचा समृद्ध इतिहास लाभलेला आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ यांचा सहवास लाभलेल्या या भूमीत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर यांनी नाथपंथ जनसामान्यात रुजवला. गोरक्षनाथ गड, मायंबा डोंगर, कानोबा डोंगर, मढी अशा अनेक नाथपंथीय जागा गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये आढळतात. परंतु अशा अनेक जागा आहेत की ज्या लोकांना अपरिचित आहेत, त्यामुळे अजूनही दुर्लक्षित आहेत. त्यापैकीच एक अद्भुत लेणी आहे ज्या ठिकाणी गहिनीनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केली, जिथे गहिनीनाथांना त्यांचे गुरु गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला. ते दिव्य स्थान म्हणजे "वनचरा सटवाई लेणी."

पाथर्डी तालुक्यातील कराड वाडी हे एक छोटेसे गाव आहे. श्रीक्षेत्र मढी पासून दहा किलोमीटर तसेच म्हातारदेव वृद्धेश्वर मंदिरापासून सात किलोमीटर अंतरावरील हे गाव गर्भागिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. प्रामुख्याने शेती व गोपालन हा येथील लोकांचा व्यवसाय आहे. याच गावात गर्भागिरी डोंगराच्या पोटात एक अवाढव्य गुफा असल्याचे माझ्या कानावर आले होते. या गुहेचा संबंध नाथ संप्रदायाशी आहे असे मला समजले होते. आपोआपच पावले त्या बाजूला वळाली. कराड वाडी मध्ये गेल्यावर श्री बाळासाहेब गरजे या सद्गृहस्थाची भेट झाली. त्यांनी आम्हाला गुहेकडे जाण्याचा मार्ग सांगितला. तसेच आमची भेट श्री. ना. भ. मुरली महाराज यांच्याशी करून दिली. नाथ भक्त श्री मुरली महाराज यांनी या गुफेचा इतिहास व महत्त्व आम्हाला विशद केले.

नाथ भक्तिसार या ग्रंथाचा आधार घेत, मुरली बाबांनी सांगितले की, या गुफेमध्ये गहिनीनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. तपश्चर्या करीत असताना त्यांना मदत व्हावी या दृष्टीने वनचरा सटवाई येथे प्रकट झाली. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात 22 व्या व 23 व्या अध्यायात त्याचा उल्लेख आहे. बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथांनी त्यांना याच ठिकाणी अनुग्रह दिला. या गुहेमध्ये जवळपास आठ फूट उंचीचे शिवलिंग असल्याचे मुरली बाबांनी सांगितले. या शिवलिंगाच्या मागे भिंतीवर गहिनीनाथांनी वनचरा सटवाईची स्थापना केली. ही सर्व कथा ऐकून, कधी एकदा या लेणीपर्यंत जातो व त्या लेणीचे दर्शन घेतो असे झाले होते.

नाथ भक्त श्री मुरली महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही लेणीकडे निघालो. निर्मनुष्य डोंगर वाटांमधून ही वाटचाल असल्याने, तसेच त्या ठिकाणी आजकाल कुणीही जात नसल्या कारणाने, जंगली स्वप्नांपासून जपून जाण्याचा सल्ला मुरली बाबांनी आम्हाला दिला. गावाबाहेरूनच एक कच्चा रस्ता श्रीकृष्ण गोशाळेपर्यंत जातो. श्रीकृष्ण गोशाळे जवळ गाडी उभी करून आम्ही लेणी कडे वाटचाल सुरू केली. साधारणपणे एक तास चालल्यानंतर आम्हाला तारक नाथांची समाधी दिसली. तारक नाथांच्या समाधी बद्दल या परिसरात एक मान्यता आहे. असे म्हणतात की जर आपले पशुधन आजारी पडले तर, त्याची लाकडी प्रतिकृती समाधीला अर्पण करून पशुधनाच्या आरोग्याचे साकडे घालावे, असे केल्याने तारक नाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो व आपले पशुधन स्वस्थ होते. तारक नाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही वनचरा सटवाई लेणी कोणत्या दिशेला असावी याचा एक अंदाज बांधला. डोंगरदऱ्यांमध्ये भटकण्याचा इतक्या वर्षांचा अनुभव या ठिकाणी कामाला आला. घनदाट झाडींमधून मार्ग काढीत आम्ही प्राचीन तुटलेल्या पायऱ्यांच्या अवशेषांपाशी पोहोचलो. या ढासळलेल्या पायऱ्या गर्द वनराई मध्ये जवळपास अदृश्य झाल्या होत्या. परंतु त्यांना बघून आपण योग्य दिशेला जात आहोत याची खात्री झाली. या पायऱ्यांच्या बाजूने 15 मिनिट चालल्या नंतर काही मानवनिर्मित प्लास्टिकचा कचरा दिसू लागला. आपण गुफेच्या अगदी जवळ असल्याची ती खूण होती. घनदाट झाडांच्या या पायवाटेने वर येतात सटवायची अजस्त्र गुफा आपल्या नजरेस पडते. अंदाजे 25 फूट उंच व 30 फूट लांबीची ही गुफा आहे. गुहेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला आठ फूट उंचीचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग दिसते, तसेच या शिवलिंगाच्या मागे छताजवळ वनचरा सटवाई मातेचा तांदळा दिसतो. हा तांदळा आकर्षक रंग रंगोटी केलेला आहे. या ठिकाणी खूप कमी वर्दळ असल्याकारणाने झाडीझुडपे वाढली आहेत. शिवलिंगा समोरच गुफेमध्ये काही काळ त्या शांततेचा अनुभव घेऊन आम्ही जवळच 50 मीटर अंतरावर असलेल्या आणखी एका गुहे जवळ गेलो. या भव्य गुहेमध्ये आणि छोटे छोटे कप्पे दिसतात. गुहेच्या मध्यभागी एक यज्ञ कुंड सुद्धा दिसते. यावरून ध्यान साधनेसाठी या गुहेचा वापर केला जात असावा हे स्पष्ट होते. गुहे बाहेरच पावसाळ्यात एक मोठा धबधबा येथे कोसळत असतो.

नाथ संप्रदाय हा सिद्ध विभूतींचा संप्रदाय आहे. जनसामान्यांपासून दूर, घनदाट जंगलात, गर्भागिरी डोंगराच्या पोटात असलेली ही गुफा सिद्धी प्राप्तीसाठी अतिशय योग्य आहे. नाथ भक्त मुरली महाराजांसारखे खूप कमी लोकांनी हा आपला वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त शिवभक्तांनी नाथभक्तांनी या जागी नक्की भेट द्यावी. परंतु ही वाट अनवट असल्याकारणाने एकटे जाणे टाळावे. या जागेचे पावित्र्य राखावे.

आपलाच,
विशाल लाहोटी
संस्थापक, Trekkamp धरोहर
‪@trekkampdiscoverunknown794‬

Комментарии

Информация по комментариям в разработке